बुधवार, ३ एप्रिल, २०१३

प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रा. मनोहर सप्रे यांना कर्मवीर पुरस्कार

चंद्रपूर, 1  ऑगस्ट 2010  मानवी जीवनातील इरसाल नमुने, जीवनातील वास्तव चित्र आणि दैनंदिन घटनांचे प्रतिबिंब म्हणजे व्यंगचित्र असून ते वृत्तप... thumbnail 1 summary
चंद्रपूर, 1 ऑगस्ट 2010 
मानवी जीवनातील इरसाल नमुने, जीवनातील वास्तव चित्र आणि दैनंदिन घटनांचे प्रतिबिंब म्हणजे व्यंगचित्र असून ते वृत्तपत्रात एक्स-रे रूपात प्रकाशित होत असतात, असे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रा. मनोहर सप्रे यांनी व्यक्त केले. चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कर्मवीर पुरस्कार वितरण सोहोळय़ात सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
श्रमिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हंसराज अहीर,  सकाळचे संपादक श्रीपाद अपराजित, तर अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद होते. पाहुण्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक, मा. सा. कन्नमवार, देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम प्रसिध्द व्यंगचित्रकार प्रा. मनोहर सप्रे व गडचिरोलीचे पत्रकार डॉ. गणेश जैन यांना खासदार हंसराज अहीर यांच्या हस्ते कर्मवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना प्रा. मनोहर सप्रे यांनी वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या व्यंगचित्रातून कोणत्याही मोठय़ा घटनेवर मार्मिक भाष्य करता येत असल्याने सांगितले. वृत्तपत्रातील व्यंगचित्र हा स्वतंत्र कॉलम असल्याचे यावेळी पत्रकार श्रीपाद अपराजित यांनी सांगितले.
 यंदा या पुरस्काराचे वितरण खासदार हंसराज अहीर, श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते झाले. ग्रामीण विकास वार्ता पुरस्काराचा प्रथम क्रमांक वरोरा येथील हितवादचे प्रशांत खुळे, द्वितीय सकाळचे राजुरा येथील बातमीदार आनंद चलाख, तृतीय लोकमतचे गोंडपिंपरी येथील विलास दुर्योधन व प्रोत्साहनपर भद्रावती येथील पुण्यनगरीचे बातमीदार किशोर ठेमस्कर, शंकरपूर येथील लोकमतचे अमोद गौरकार यांना जाहीर झाला. शुभवार्ता पुरस्कारासाठी चंद्रपूर समाचारचे विराज मुरकटे तर, मानवी अभिरुची वृत्तकथा पुरस्कारासाठी वरोरा येथील तरुण भारतचे अनिल पाटील तर, वृत्त छायाचित्रांसाठी देवानंद साखरकर यांना गौरवण्यात आले.
यावेळी खासदार अहीर यांनी पत्रकारितेमुळे लोकशाहीला बळ मिळाल्याचे सांगून, ती राजकारण्याला दिशादर्शक असल्याचे म्हटले. संसदेत प्रश्न मांडताना वृत्तपत्रातील बातम्या मार्गदर्शक ठरतात. पत्रकारितेत मोठी शक्ती असल्याने लोकशाहीला ती पोषक वातावरण देत असते. बाळ हुनगुंद यांनी, जिल्हय़ातील पत्रकारांनी उचलून धरलेल्या प्रकरणांवर प्रकाश टाकला. एखाद्या मोठय़ा प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे काम बातम्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले. स्पध्रेचे परीक्षक सुनील देशपांडे, प्रा. सुरेश चोपणे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तुमराम, संचालन राजेश मडावी यांनी तर, आभार मंगेश खाटीक यांनी मानले. कार्यक्रमाला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, अ‍ॅड. प्रशांत खजांची, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू राजगडकर, मधुसूदन रूंगठा, विनोद दत्तात्रय, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे, प्राचार्य रमेश मुनघाटे, मोहन धनकर, रमेश तिवारी, अशोक पवार, अशोकसिंह ठाकूर, विनायक बांगडे, सुरेश धोपटे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

Sponsor

test