
चंद्रपूर, २७ जून :
चंद्रपूर-गडचिरोली पत्रकार संघातर्फे ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरूची वृत्तकथा आणि वृत्तछायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी १५ जुलैपर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येतील.
स्व. छगनलाल खजांची स्मृती ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण वार्ताहर भाग घेवू शकतात. या स्पर्धेसाठी परिणामकारक वृत्त, वार्तापत्र, वृत्तमालिका ग्राह्य धरण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रथम, द्बितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोख पुरस्कार, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच स्व. छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कार हा केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल.
लोकसेवा आणि विकास प्रतिष्ठानतर्फे प्रायोजित मानवी स्वारस्याच्या बातमीसाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार असून, पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही स्पर्धा चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांससाठी खुली राहील. इतिहास अभ्यासक अशोकqसह ठाकुर प्रायोजित हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेवू शकतात. रोख एक हजार रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारासाठी १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरीत नसावे. स्पर्धा मराठी, हिन्दी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मूळ प्रतीसह चार छायांकित प्रतित असावे. मूळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोबत आपली बातमी कोणत्या स्पर्धेसाठी आहे याचा स्पष्ट उल्लेख तपशीलवार करावा. यापूर्वी दोनदा पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांनी त्या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवू नये. सर्व प्रवेशिका १५ जुलै २०१४ पर्यंत स्पर्धा संयोजक, प्रेस क्लब, जुना वरोरा नाका, चंद्रपूर या पत्त्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक जितेंद्र मशारकर, देवानंद साखरकर, प्रशांत देवतळे यांनी केले आहे.
================