शनिवार, ६ एप्रिल, २०१३

पत्रकारांनी भाषेचे सौष्ठव जपावे – डॉ.सुधीर गव्हाणे


चंद्रपूर दि.07- वृत्तपत्र लिखानात भाषेला अनन्यसाधारण महत्व असून लिखान बहुआयामी करण्यासाठी पत्रकारांनी वाचनासोबतच भाषेचे सौष्ठव जपण्याची गरज  असल्यचे मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले.  संवादाची नवनविन माध्यमे विकसीत होत असून इंटरनेट माध्यमासोबतच सोशल नेटवर्किंगचा जास्तीत जास्त वाफर संवादासाठी करा असा सल्ला त्यांनी दिला.
चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेत वृत्तलेखन, भाषा व मांडणी या विषयावरील चर्चा सत्रात गव्हाणे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.  कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त संदेश हे बातमीचे तंत्र असून ते विकसीत करण्यासाठी वाचनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेटमुळे जग लहानशे खेडे झाले असून या माध्यमांचा पत्रकारांनी प्रभावी वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला. माध्यमांच्या ग्लोबलायझेशन मध्ये सिटीझन जर्नालिस्ट ही संकल्पना उदयास आली असून या नव्या संकल्पनेत आपले अस्तित्व अभ्यास व अद्ययावत ज्ञानामुळेच अबाधित राहू शकेल असे त्यांनी सांगितले.
दुस-या सत्रात पत्रकारिता आणि शुध्द लेखन या विषयावर दीपक रंगारी यांनी मार्गदर्शन केले.  भाषेमुळे मनावर संस्कार होत असून मनाच्या शूध्द आचरणासाठी भाषा शूध्द असणे अत्यंत गरजेचे असल्याचे रंगारी यांनी सांगितले.  या कार्यशाळेत त्यांनी प्रात्याक्षिकाव्दारे उपस्थितांना शूध्द लेखनाचे धडे दिले.  वृत्तपत्र वाचनातून वाचक आपली मते ठरविण्यासोबतच  लिखानाची शैली निश्चित करत असतात.  त्यामुळे पत्रकारांनी आपले असंख्य वाचक डोळयासमोर ठेवून लिखान केले पाहिजे.  लिहलेले शूध्द व अचुक असावे याची काळजी घेतल्यास भाषा समृध्द होईल असा विश्वास रंगारी यांनी व्यक्त केला.
एसएमएस पत्रकारितेचे महत्व या विषयावर पुणे येथील चिंतन गृपचे आप्पा डिंगणकर यांनी मार्गदर्शन केले. सद्याचे जिवन अत्यंत घाईचे झाले असून संपूर्ण वृत्तपत्र वाचण्यासाठी  लोकांकडे वेळ नाही अशा वेळी एसएमएसव्दारे बातम्या वाचकांपर्यत पोहचविल्या पाहिजे हा विचार करुन एसएमएस वृत्तसेवा सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल ही जीवनावश्यक वस्तु झाल्यामुळे  माहितीच्या देवाण घेवाणीसाठी   मोबाईल माध्यमांचा मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. एसएमएस वृत्तसेवा त्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असून थोडक्यात बातमी देण्याची कला या माध्यमातून विकसीत झाली आहे.  एसएमएस वृत्तसेवेतील विश्वासार्हता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कंपन्यानी एसएमएस माध्यमांचा आपल्या उत्पादनाची  विपणन व जाहिरात करण्यासाठी अत्यंत खुबीने वापर केल्याचे त्यांनी सांगीतले.  
वृत्तलेखन भाषा व मांडणी, शूध्दलेखन तसेच एसएमएस पत्रकारितेचे महत्व या तिन्ही सत्राचे संचलन पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले.  या कार्यशाळेस जिल्हाभरातून पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.  
000